Monday, June 27, 2011

सामराजगड आणि रेवदंडा

पद्मदुर्ग आटोपून ११ च्या सुमारास राजपुरीतून निघालो. आता लक्ष्य सामराजगड होते. सामराजगड हा छोटासा दुर्ग मुरुड आणि राजपुरी यांच्यामध्ये असलेल्या एकदरा गांवाजवळ आहे. एकदरा गांवातले लोक किल्ला म्हटल्यावर नीट माहिती देईनात. शेवटी भगवान चिलेंच्या पुस्तकांत वाटेची माहिती मिळाली. एकदरा गांवातल्या शिव मंदिराजवळ गेल्यावर मुरुड समुद्रकिनार्याचा सुंदर देखावा दिसतो.



इथुनच चढाईला सुरुवात करायची. वर चढतांना वाटेत काही शिल्पावशेष दिसतात.



गडावर रचीव तटबंदी दिसते.



बाकी जास्त अवशेष नसले तरी सामराजगडाची इतिहासाने मात्र छोटीशी नोंद घेतलेली आहे. हा किल्ला १६७१ च्या होळीच्या रात्री सिद्दीने गडावर हल्ला केला. दुर्दैवाने दारुकोठाराचा स्फोट झाला. महाराज त्यावेळी जंजिर्यापासून २० कोस अंतरावरील एक गांवी झोपलेले होते. ज्यावेळी राजपुरीला दारूचा स्फोट झाला त्याच वेळी निद्रिस्त असलेले महाराज दचकून जागे झाले ' दंडा राजपुरीवर काहीतरी संकट कोसळले आहे' असे उद्गार त्यांनी निकटच्या लोकांजवळ काढले. त्वरित जासूद रवाना केले गेले, तोवर दंडा राजपुरी म्हणजे सामराजगड हातातून गेला होता.
गडावरून जंजिरा पद्मदुर्गाचा मस्त देखावा दिसतो.

जंजिरा



पद्मदुर्ग



सामराजगड उतरून खाली आलो तोवर जेवणाची वेळ झाली होती. मुरूडच्या 'पाटील खानावळी' पोटपूजा झाली. मुरुड बीचवर हे लांब मान काढून डोकावणारे नारळाचे झाड, दैनिक लोकसत्ताचे छायाचित्रकार सुधीर नाझरेंमुळे अनेकांना माहिती असेल. मागे दिसतोय तो सामराजगड...!!



परतीच्या प्रवासांत रेवदंडा दुर्गाची तटबंदी फोडून केलेल्या रस्त्यावर आलो तेव्हा वाजले होते. रेवदंडा किल्ला पूर्ण पहायचा झाला तर खूप वेळ मोडणार होता त्यामुळे मला पुढे उशीर होण्याची शक्यता वाढायला लागली होती. पण सुदैवाने आपटेकाकांनी काही मुख्य अवशेष पाहून लगेच निघायचा निर्णय घेतला.
इतिहासाकडे पाहू जाता, .. १५५८ मध्ये पोर्तुगीज कॅप्टन सोज याने हा किल्ला बांधला. .. १६३६ मध्ये निजामशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या शहाजीराजांनी रेवदंड्याच्या कॅप्टनकडे कुटुंबकबिला किल्ल्यांत ठेवण्याबाबत केलेली विनंती त्याने मान्य केली नव्हती. संभाजीराजांच्या काळांत मराठ्यांनी हजार शिपाई हजार घोडेस्वारांसह रेवदंड्यास वेढा घालून २२-२३ जुलै १६८३ च्या रात्री हल्ला केला, पण पोर्तुगीजांनी सिद्दींच्या मदतीने तो उधळून लावला. पोर्तुगिज शैलीत असलेलं किल्ल्याचं बांधकाम सध्या खूपसं पडीकावस्थेत आहे. पोर्तुगिज धाटणीच्या प्रचंड भिंती, काही तोफा आढळतात.



पण बघायलाच हवं ते मजली उंच घंटाघर किंवा सातखणीच्या मनोर्याची इमारत. याचा उपयोग वॉचटॉवर म्हणून होत असणार.



इथेच खाली फोर्ज वेल्डेड तोफा ओतीव तोफा दिसतात्.या मनोर्याच्या मागील बाजूच्या तटातून एका दरवाजाने समुद्राकडे बाहेर जाणारी वाट आहे. इथून रेवदंड्याच्या तटाच्या प्रचंड बांधकामाची कल्पना येते.



..आणि समोरच दिसणारा कोरलई दुर्ग..



रेवदंड्याच्या तटबंदीचा परीघ किमी. चा होता. या तटबंदीमध्ये भुयारे आहेत. जुलै १९८२ मध्ये 'केव्ह एक्स्प्लोरर्स' संस्थेच्या सभासदांनी या भुयारांचा शोध घेतला आहे. भुयारांआतील बांधकाम दगडविटांनी केलं आहे. आज वाढलेल्या झुडपांमुळे आत जाता येत नाही. किल्ल्यात आता बरीच खाजगी वस्ती झाली आहे. बर्याच ठिकाणी तटावरून फिरता येते, पण झाडोरा खूप माजला आहे. एका दरवाजावर मोठा दगडी मुकूट राजचिन्ह कोरलेले दिसते



... पण भिंतीवरील झाडांची मुळ्यांनी या ऐतिहासिक ठेव्याला इजा होत आहे.



आतल्या वस्तीत सिद्धेश्वर मंदिराची चौकशी करत तिथे गेलो. या मंदिरामध्ये पोर्तुगीज काष्ठशिल्पाचा उत्तमपैकी नमुना असलेला एक वासा दिसला. त्यांवर शिकारीचा प्रसंग कोरलेला दिसतो.



उन्हांत भटकल्याने लागलेली तहान मंदिरात गार पाण्याने भागवली. माहितगार घेतला तरी किल्ला पहायला दोनेक तास तरी हवेत. तिथून लगेच निघाल्याने वेळेत घरी पोहोचलो हे महत्त्वाचे. नाहीतर डोळे वटारलेली घरची आघाडी सांभाळणे किल्ल्यांच्या चढाईपेक्षा कठीण असते. रेवदंडा मनाजोगा पाहून झालेला नाहीये, त्याची डिट्टेल भटकंती पुन्हा केव्हातरी...

याआधीचा भाग कांसा बेटावरचा पद्मदुर्ग..



Tuesday, June 21, 2011

कांसा बेटावरचा पद्मदुर्ग..

२- ३ वर्षांपूर्वी कुठल्यातरी ट्रेकवेळी विनयने खटकी पडल्यागत एक भन्नाट ऑफर दिली. मोजक्या मंडळींना घेऊन सहसा न होणारे सागरी किल्ले करायचे आहेत. खांदेरी-उंदेरी, पद्मदुर्ग उर्फ कांसा आणि सुवर्णदुर्ग. या सर्व किल्ल्यांवर जाण्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट जमवावी लागणार होती ती म्हणजे स्थानिक नावाड्यांशी संपर्क नि परवानगी. हे काम विनयने इतर सोबत्यांच्या मदतीने उत्तमपैकी हाताळलं. इतर किल्ल्यांप्रमाणे हे किल्ले सहजपणे होणारे नव्हेत त्यामुळे कितीही महत्त्वाची कामे असली तरी ती बाजूला सारायला हवी होती. सगळ्यांच्या सोयीसाठी पद्मदुर्गाच्या तारखा ३-४ वेळा बदलल्या तरी शेवटी तारीख पक्की ठरली ती माझ्यासाठी अत्यंत गैरसोयीची निघाली, ....:अओ:, कारण ट्रेकच्या दुसर्‍या दिवशी चुलतभावाचं लग्न कोल्हापूरला होतं. मजबरोबर बायको नि मुलेही !!. टांगारुपणा करण्यासाठी यापेक्षा आणखी सोयीचं कारण कांय हवं होतं!! ...पण पद्मदुर्ग या चुंबकाने घट्ट धरून ठेवलं होतं.


वडील लगीनघाईमुळे कोल्हापुरातच होते, त्यांना फोन करुन सांगितलं की मी आदल्या दिवशीच्या कार्यक्रमाला हजर राहू शकणार नाही. त्यांनी कारण विचारण्याआधीच फोन कट झाला. बाबांपासून मला वाचवण्याची सगळी जबाबदारी बायकोवर आली. तिला आधीच शरण गेलो होतो. माझा नेहमीचा डोंगरसोबती चिन्मय त्यावेळी डोंबिवलीतच होता आणि तोही पद्मदुर्गला येणार होता. मी ट्रेकच्या आदल्या दिवशी सगळा कबिला घेऊन त्याच्याकडे गेलो. २ ट्रेकरांच्या बायका एकत्र आल्यावर अत्यंत धोकादायक वातावरण निर्माण होतं. प्रत्येक शब्द जपून वापरावा आणि निमूट ऐकावा लागतो. चिन्मयने माझं दुसर्‍या दिवशी ट्रेक आटोपल्यानंतर, कोल्हापुरसाठी रात्रीच्या खाजगी बसचं आरक्षण करून ठेवलं होतं, त्यामुळे लग्नालाही कोल्हापुरात पहाटे मी हजर असणार होतो. हुश्श्श!!!
रात्रीचं जेवण आटोपून दोघेही ठरल्या वेळी+ ठिकाणी गेलो. रात्रीचा प्रवास करून पहाटे राजपुरीला पोहोचलो. तिथे एक मोठं बालगणेशाचं मंदिर आहे. जवळच एक भैरोबाचंही देऊळ आहे, तिथेच थोड्या वेळासाठी पथार्‍या पसरल्या.


फटफटल्यावर आमच्या नावाड्याच्या, गोपाळच्या घरी गेलो. तिथे प्रत्येकाच्या पोतडीतून निघालेले च्यॅवम्याव हादडले.


ज्यांच्यामुळे पद्मदुर्गाची सफर आम्हांला घडली ते हे २ प्रमुख म्होरके... विनय कुलकर्णी - राजन महाजन. राजनची आणि टोमू उर्फ संदिपची या लेखासाठी मला मोठी मदत झाली.


बर्‍याच वेळाने घरातून चहा आला. उशीर होत होता तसतशी चुळबुळ वाढत होती. चहा घेऊन जेटीकडे निघालो.

वाटेत कॅमेर्‍याचीही चुळबुळ वाढली होती


डावीकडे बलदंड जंजिरा डोकावत होता.


राजपुरीच्या धक्क्यावर गोपाळची बोट उभी होतीच. जंजिर्‍याला जाणार्‍या पर्यटकांचीही लगबग सुरु होती.


गोपाळची ३ मुलं आणि त्यांचे २ मित्रही मदतीसाठी सोबत येणार होते. धक्क्यावरून बोट निघेपर्यंत ८ वाजले होते. समोर बलदंड जंजिर्‍याचं प्रवेशद्वार, त्याचे बुरुज, तटातून डोकावणार्‍या तोफांची तोंडे कॅमेर्‍याला कामाला लावत होती.








एका वेगळ्या कोनातून आज जंजिरा पहायला मिळत होता. सिद्दींचा हा अभेद्य नि बलाढ्य जलदुर्ग शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. या दुर्गावर व सिद्दींच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी इ.स. १६७५ मध्ये शिवाजी महाराजांनी मुरुड्च्या समोर खोल समुद्रात असलेल्या कांसा बेटावर पद्मदुर्गाचं बांधकाम करण्याची जबाबदारी दर्यासारंग व दौलतखानावर सोपवली. रसद पुरवण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली होती. या सुभेदारांनी आपल्या कामांत कसूर केल्याचे महाराजांना समजताच संतप्त महाराजांनी १८ जानेवारी १६७५ रोजी लिहिलेले पत्र प्रसिद्ध आहे. त्यांत महाराज म्हणतात,
' पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली आहे, त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान पावावे, ते होत नाही. पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करत असतील आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही कराल. न कळे की हबशीयांनी काही देऊन आपले चाकर तुम्हांस केले असतील. त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल. तरी ऐशा चाकरांस ठाकेठिक केले पाहिजेत. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करु पाहतो. या उपरि बोभाट आलिया उपरि तुमचा मुलाहिजा करणार नाही...ताकीद असे.'
सिद्दीशी संघर्ष करतच या दुर्गाची उभारणी झाली. पद्मदुर्गाशी संबंधित दुसरा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे, ऑगस्ट १६७६ मध्ये मोरोपंतांनी पद्मदुर्गावर आरमारी चाकरी करणार्‍या सोनकोळ्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला, त्यावेळी सोनकोळ्यांचा म्होरक्या लाय पाटील यांना 'जंजिरेयासी शिड्या तुम्ही लाऊन याव्या. आम्ही हजार धारकरी तयार केले आहेत' असे सांगितले. पंतांच्या सांगण्यानुसार लाय पाटलांनी आपली जबाबदारी पार पाडली. रात्र संपत आली तरी पंतांचे धारकरी आलेच नाहीत. शिड्या परत काढून घेऊन लाय पाटील पद्मदुर्गावर परत आले. नंतर ओशाळलेले पंत त्यांना म्हणाले,' आम्हापासून कोताई जाली. धारकरीयांनी माघार घेतली. आम्हापासोन अंतर पडले हे खरे..'. मोरोपंतांनी लाय पाटलांना रायगडावर नेले व सगळी हकिगत महाराजांच्या कानावर घातली. महाराज म्हणाले,' यांनी ऐसे कार्य केले असता तुम्ही कोताई केलीत्..कार्य राहून गेले..' या लाय पाटलांचा महाराजांनी पालखी देऊन सत्कार केला पण लाय पाटलांनी पालखी नम्रतापूर्वक नाकारली. महाराजांनी पेशव्यांना आज्ञा केली,' गलबत बांधोन त्या गलबताचे नांव पालकी ठेऊन लाय पाटील यांचे स्वाधीन करणे'. संभाजीराजांच्या काळातही पद्मदुर्ग मराठ्यांकडे होता. सिद्दीने तो नंतर जिंकून घेतला, तो शेवटपर्यंत त्याच्याकडेच राहिला.
इतिहासाची उजळणी करण्याच्या नादांत सुरुवातीस लांबवर दिसणारा पद्मदुर्ग आता हळूहळू जवळ येऊ लागला.


या दुर्गाजवळ बोट लावण्यासाठी धक्का किंवा एखादी बरीशी जागाही नसल्यामुळे गोपाळने बोट कौशल्याने ज्या ठिकाणी दोन खडकांमध्ये उभी केली तिथे लाटांमुळे तीचा एकदम भरात हलेडुले नाच सुरु होता. कसरत करतच गोपाळ आणि सहकार्‍यांच्या मदतीने सगळे कसेबसे त्या निसरड्या खडकांवर पायउतार झाले.


जवळच पद्मदुर्गाचा पूर्वेचा दरवाजा आमच्या स्वागताला उभा होता.


ढोबळपणे पूर्वेच्या दरवाजापासून दुर्गाच्या बांधकामाचे ३ भाग पडतात. मुख्य किल्ला- पडकोट आणि भिंतीचे अवशेष. दुर्गाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या बाहेरील भिंती आणि पुढेही काही ठिकाणी तटातले दगड समुद्राच्या पाण्याच्या शेकडो वर्षांच्या मार्‍याने झिजलेत पण त्या दगडांना जोडणारे चुन्याचे मिश्रण आजही तसेच टिकून आहे.




मुख्य किल्ल्याला वळसा मारून आम्ही प्रथम पडकोटाकडे मोर्चा वळवला. मुख्य किल्ला व पडकोट यांमध्ये एक छोटीशी पुळण आहे. इथे शंख शिंपल्यांच्या तुकड्यांचा खच पडलेला होता. पडकोटाचं मुख्य आकर्षण म्हणजे कमलदलाच्या आकाराचा बुरुज..!!


आपटेकाकांनी या किल्ल्यासंबंधीचा इतिहास व इतर माहिती सांगितली.


पाटी लिहावी ती पुणेकरांनी तर पाठीवर कांयबाय लिहावं ते म्हमईकरांनी...


मी सुरुवातीला पद्मदुर्गाला चुंबक म्हणालो, त्याचा प्रत्यय इथे फिरतांनाही येत होता. थोडक्या वेळात कांय कांय पाहू असं झालं होतं!!


पडकोटातील तटांत शौचालयही आढळले.


याशिवाय कबर, पाण्याचं कोरडं टाकं, कोठाराचे अवशेष दिसतात.


इथून जंजिर्‍याकडे पहातांना अंगात एक वेगळीच खुन्नस चढत होती, कारण आजही पद्मदुर्ग हा पडीक अवस्थेत असला तरी आपल्या राजाचा किल्ला आहे ही भावना मनांत पक्की होती. आपल्या अपयशाचा इतिहास वाकुल्या दाखवित सांगणारा जंजिरा शासनदरबारी प्रमुख पर्यटनस्थळ... मान्य करतो की जंजिरा हा इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा दुर्ग आणि साहजिकच पर्यटकही मोठ्या प्रमाणात येणार..! ..पण म्हणून जंजिर्‍यापासून मैलभर अंतरावर असलेला, शिवरायांची आरमारी दूरदृष्टी नि लाय पाटलांची मर्दुमकी अभिमानानं मिरवणारा माझ्या राजाचा पद्मदुर्ग दुर्लक्षित...स्थानिकांच्या पार्ट्यांसाठी???? योग्य परवानगीने, स्थानिकांनी आणि शासनाने मनावर घेऊन पद्मदुर्गाची सफर आणि त्याचे महत्त्व लोकांपुढे आणायलाच हवं.


तटावरील चर्यांचा आकारही कमळाच्या पाकळ्यांचा आहे. या दुर्गाचं आढळलेलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुर्गात विपूल असलेल्या तोफा. जवळपास पन्नासेकतरी तोफा आमच्या दृष्टीस पडल्या. बुजलेल्या अवस्थेतही आणखी काही असतीलही. त्याचप्रमाणे, दुर्गावर दिसलेल्या दारुच्या बाटल्या, पेपरडिशेस व बाकी कचरा या ठिकाणी स्थानिकांच्या पार्ट्या होत असणार हेच दर्शवत होता. पडकोटाच्या बाजूला खडकाळ भागानंतर भिंतीचं मोठं बांधकाम आहे. त्या भिंतीवर चढल्यावर तिथून पद्मदुर्गाचा एक वेगळा अँगल मिळेल म्हणून मी व किरण दोघांनीही वर चढून काही फोटो मिळवले.




आता मुख्य किल्ला बघायचा राहिला होता. मुख्य किल्ल्यांत तटाला लागून रो हाऊसप्रमाणे एकाला एक लागून ८ पडीक खोल्यांचे अवशेष आहेत.


अलिकडच्या काळांत कस्टमच्या लोकांसाठी बांधलेल्या सिमेंटच्या खोल्यांचेही अवशेष त्याचप्रमाणे त्यांच्या वापरासाठी बांधलेली पाण्याची टाकीही आहेत.


तटावर चढायला पायर्‍या बांधल्या आहेत.


तटामध्ये बांधलेल्या जुन्या खोल्यांचं बांधकामही पहाण्यासारखं आहे.




गोपाळने आता बोट आधीच्या जागेवर न आणता मधल्या पुळणीच्या ठिकाणी आणली.


जाता जाता कमळाकार बुरुजाचा फोटो घ्यायला एक भारी जागा दिसली. पळत जाऊन बुरुजाचा फोटो घेतला.


समुद्रातल्या या राजांच्या पद्मशिल्पाला नमस्कार करून निघालो तोवर १० वाजले होते. येतांना विनयने आणखी एक बोनस दिला. जंजिर्‍याच्या मागच्या बाजूला प्रदक्षिणा घालून नेण्याची विनंती गोपाळला केल्यावर त्यानेही बोट तिकडे वळवली. गोपाळमुळे जंजिर्‍याचा दर्या दरवाजा आम्हांला दर्यातून पाहायला मिळाला.


राजपुरी कोळीवाड्यावर परत आल्यावर बोट धक्क्याला लावतांना लाटांमुळे नुसती लवलवत होती. गोपाळबरोबर असलेल्या मुलांना हा आटापिटा थोडा कठीणच जात होता. तो ओरडला-'.. नुसतेच पगार घेतात येड **.... काम नको करायला रांडेच्यांना...!!' गंमत म्हणजे त्यांत त्याचीही ३ मुले होती. गोपाळ नि राजपुरीचा निरोप घेऊन आम्ही ११ वाजता निघालो. आता लक्ष्य सामराजगड...!! (क्रमशः...)

Thursday, February 17, 2011

रथसप्तमी मुक्काम परुळे...!

एका घरगुती समारंभासाठी गोव्यात जायचं ठरत असतांनाच बाबांनी हळूच एक पुष्टी जोडली- '..त्या समारंभाच्या दुसर्‍या दिवशी रथसप्तमी आहे. दरवर्षी परुळ्याला जायचं म्हणतोस, यंदा जमेल बघ..!' येस्स्स्स! ठरलं!! की, या वर्षी परुळ्याच्या श्रीदेव आदिनारायणाच्या रथसप्तमी उत्सवाला जाणे'च' आहे. पंचमी-षष्ठी-सप्तमी असा ३ दिवस दणक्यात चालणारा, भरपूर मनोरंजनाचे स्थानिक कार्यक्रम स्पर्धा- किर्तन- दशावतारी नाटक वगैरेंची रेलचेल असणारा हा उत्सव आता हळूहळू मोठं स्वरुप घेऊ लागला आहे. पूर्वी उत्सवादिवशी स्थानिक आणि काही मुंबईतून अशी शेकड्यांत जमणार्‍या मंडळींची संख्या आता उत्सवागणिक हजारोने होत आहे.
गोव्यातला कार्यक्रम आटोपून आम्ही त्याच रात्री मुक्कामी परुळ्याला आलो. कुडाळपासून साधारण १५ किमी. अंतरावर हे गांव आहे. बाबांचं बालपण याच गांवात आणि याच मंदिराजवळ गेलेलं.. आणि माझा जन्म इथला त्यामुळे माझं नाळकंही इथंच पुरलेलं!

गांवाचं लोकेशनही एकदम भन्नाट...मर्‍हाटीचा झेंडा ऑस्करपर्यंत नेणार्‍या 'श्वास' चित्रपटाचं चित्रिकरण याच गांवातलं! या चित्रपटाची सुरुवातीची नांवं येतात तेव्हा दर्शनी सुरु असलेलं गोफनृत्य या आदिनारायणाच्या मंदिरासमोरच चित्रित झालेलं. ...आणि तारकर्ली-भोगवे-निवतीसारखे सागरकिनारे एकदम जवळ..
.. गौड ब्राह्मणांपैकी धनंजय गोत्राच्या काही घराण्यांचं उपास्य दैवत असलेलं श्रीदेव आदिनारायण सूर्यमंदिर अंदाजे सातशे वर्षांपूर्वी बांधलं गेल्याचा तर्क आहे. याला निश्चित पुरावा नाही. सध्या जी मूर्ती आहे तीदेखील साधारणपणे अडीचशे वर्षे जुनी असावी. मंदिराबाहेर असलेल्या पिंपळपारावर पूर्वी पूजेत असलेल्या पण भग्न झाल्यामुळे विसर्जित केलेल्या २ मूर्ती व त्यांचे अवशेष ठेवलेले आहेत. सध्याच्या मूर्तीपेक्षाही या जुन्या मूर्तींवर असलेलं कोरीव काम खिळवून ठेवतं.
या मंदिराचं बांधकामही दणकट आहे. सभामंडपातील लांब व मोठ्या परीघाचे असलेले लाकडी वासे, बाहेरील मोठठठे खांब आणि एकदम हवेशीर असलेली आटोपशीर बाहेरची ओवरी इथून हलू देत नाही. लहानपणी या मंदिरात जाम खेळणं-कुदणं झालेलं असल्याने सारखं रेंगाळायला होत होतं. मंदिराच्या मागील बाजूंस उमा- महेश्वर मंदिर आहे.
उत्सवाच्या तिन्ही दिवशी मूर्तीची वेगवेगळ्या आसनांमध्ये बांधलेली अत्यंत देखणी पुष्पपूजा बघण्यासारखी असते. पण खरा सोहळा असतो तो सप्तमीदिवशी. पहाटे साडेचारला उठून- आवरून सोवळ्याने अभिषेकाला बसल्यावर द्विभूज असलेली संपूर्ण मूर्ती मनसोक्त न्याहाळता आली. मुकूट-कर्णभूषणे- गळ्यात हार- बाहूभूषणे- कंबरेला मेखला, दोन्ही हातांत कमलपुष्पे, पायाजवळ दोन्ही बाजूंना उषा- प्रत्युषा आणि त्याखाली सात अश्व असलेली पट्टी ... याशिवाय कोरीव गुडघे लक्ष वेधून घेत होते.



सकाळपासूनर्शनाला येणार्‍या मंडळींची रिघ लागू लागली. येणार्‍या प्रत्येकाच्या जेवणाची सोय देवस्थानाने केलेली होती. श्री. चंदुकाका मणेरीकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी बनवलेलंसुग्रास जेवण जेवणारा पुढील वर्षी यासाठी तरी नक्कीच येणार हे जेवतं तोंडच सांगत होतं! संध्याकाळी मंदिरासमोरील जागेत सगळ्या स्त्रियांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम... रात्री मंगलाष्टकांच्या गजरात देवाची पालखी निघते तो कार्यक्रम..पालखीनंतर आरती.. श्री.मणेरीकरबुवांचं किर्तन आदी भरगच्च कार्यक्रमांनी दिवस भरलेला होता.






पालखीवेळी घराकडे आलो तोवर दशावतारी नाटक कलाकारांनी आख्खं अंगण काबीज केलेलं! सर्व कलाकारांचं वदन स्विकारण्यास श्रीदेव गजाननही अधिष्ठीत झालेले होते.

दशावतारी कलावंत स्वतःचा मेकप स्वतःच करतात आणि तो करतांना त्यांच्या एकेक क्लृप्त्याही भारी बघण्यासारख्या असतात. अर्ध्या- पाऊण तासापूर्वीचा टकल्या- काळा इसम गोरीपान देखणी दुर्गादेवी म्हणून प्रवेशासाठी तयार होतो. शंकराचंही तसंच.... प्रत्येकाच्या स्वतःच्या स्वतंत्र पेटीतून कांय कांय निघत होतं? मेकपचा बेस असलेलं क्रीम, पावडरी, भडकपणा येण्यासाठी रंग, हार व इतर दागिन्यांपासून अगदी साड्या, शेले, मोत्यांच्या माळा ....आगागागा...!!! यांच्यावर एक स्वतंत्र लेखमालिका होऊ शकेल!

आणखी नवलाची गोष्ट म्हणजे हळू आवाजात कुजबुजत असलेला नि सामान्य पट्टीत बोलणारा कलाकार - प्रवेशानंतर ऐssssssय ही आरोळी ज्या वरच्या पट्टीत ठोकतो आणि त्याच पट्टीत न अडखळता संवाद म्हणतो तो फरक अनुभवण्यासारखा... रात्री २ वा. दशावतारी नाटक सुरु झालं तेव्हाही दिवसभराच्या दगदगीमुळे कमी असली तरी हौशी नि रसिकमंडळी हजर होतीच. साडेपाचला नाटक 'आवरलं'.... (छ्या: ! धयकाल्याचो नाटाक रात्री १० वाजेक आख्यान सुरु करतंत ते थेट पहाटे कोंबो आरवेपर्यात ....त्यामुळे आवरलं म्हटलं.) आता मीही आवरतो.

फुड्ल्या रथसप्तमीयेक जमलां तर जरा मंदिराथंय दिस काढा वायंच!! नायतर हल्ली कर्लीचो पूल झाल्यामुळे बर्मुडा घालूनशान कारने देवबागेक/ मालवनाक जानारे -'पिउन पडो नि दंडवत घडो' अशा या बेतान येतंत नि जाता जाता कांय पुन्य गांवतां कांय बघतंत....!

ता.क.: परुळ्याच्या गौरीशंकर मंदिरातही महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. हा लेख वाचून पुढच्या रथसप्तमीपर्यंत कुणाला धीर धरवत नसेल तर हे निमित्त पुरवतो.