Wednesday, January 19, 2011

किल्ल्यांवरची हागणदारी...!

तिनेक दिवसांची जोडून सुट्टी आली की हौशा- नवशा- गवशा तथाकथित ट्रेकर्स लोकांची धिंगाणा घालायला काही हॉटट्ट डेस्टिनेशन्स ठरलेली आहेत. नाणेघाटाची गुहा, हरिश्चंद्रगड आणि रतनगड! ...त्याच्यात पावसाळ्याचे दिवस असतील तर ही सगळी झुंबड डॉट कॉम राजमाचीला लॉग इन असते! त्यांचा गोंगाट, प्लास्टीक कचरा आणि एकूणच वर्तणुकीचा पारंपारिक त्रास सगळ्यांना नेहमीच होतो आणि हे प्रमाण वाढतंच रहाणार आहे. आणखी एक त्रासाचा प्रकार गेल्या पावसाळ्याअखेरीस आम्ही रतनगडला अनुभवला तो म्हणजे या गडावर मुक्कामी असलेल्यांच्या प्रातर्विधीचा! नाणेघाट म्हणा किंवा हरिश्चंद्रगड, राजमाचीला मोठ्या पठारवजा जागा तरी आहेत पण रतनगडावर मुक्कामाच्या गुहांच्या जवळपास सपाटी नसल्याने (..आणि मुळातच रतनगडावर सपाटीचा भाग अतिशय कमी आहे) आणि जोडून कसल्यातरी आलेल्या सुट्ट्यांमुळे मुक्कामी असलेल्यांची संख्या मोठी असल्याने प्रातर्विधीच्या कार्यक्रमाला काहीच शिस्त नव्हती. रतनगडावर दरवाजा ओलांडून वर आलं की उजवीकडे वरील बाजूस राणीचा हुडा नांवाने ओळखला जाणारा गोल बुरूज आहे. तिथून थोडं डावीकडे वर पाण्याची टाकी आहेत. रतनगडावर मुक्कामी असणार्‍यांना पिण्यासाठी या टाक्यांचं पाणी सर्वात जवळ..! या टाक्यांजवळ कोंबड्यांच्या पिसांचा पसारा आणि इतर मद्य-मांसाहारी घाण टाकलेली होती. ( ..हा त्रास माहुलीलादेखील होतो) इथून मागील बाजूस जाणार्‍या पायवाटेवरच हागणदारीला सुरुवात झाली होती. आमच्याबरोबर दोघे- तिघे रतनगडाचे पहिलटकर होते, त्यांनी ही घाण पाहून तिथूनच कलटी मारायच्या गोष्टी सुरु केल्यावर मात्र त्यांना चुचकारत कसं तरी पुढे नेलं. पुढील गडदर्शनाने गेलेला मूड परत आला हा भाग वेगळा पण हा अनुभव वाईट्ट होता.


गडावरील जाण्यायेण्याच्या वाटा, स्मारके इ. जागा टाळून मंडळींनी आपले विधी उरकायला हवेत . ..पण हल्ली होतं कांय की सुट्टीच्या दिवशी अनेक गट किल्ल्यावर मुक्कामी असतात, त्यांत वर वर्णिलेली जनताच भरपूर असते. सकाळी पॉटघाईच्या वेळी जागा शोधायला वेळही नसतो अशा वेळी मुक्कामी असलेल्या प्रत्येक गटाच्या नेत्याने आदल्या रात्री आपल्या गटाला प्रातर्विधीच्या जागेबाबत सूचना देणं अपेक्षित म्हणण्यापेक्षा अनिवार्य असतं. ते होत नाही आणि मग किल्ला दर्शनाच्या वेळी हा सगळा त्रास सोसण्याची वेळ बाकी जनतेवर येते. आता बायोडिग्रेडेबल वगैरे असलं म्हणून कांय कुठेही टाकायचं की काय? काही सूचनांचा अवलंब केला तर खूप त्रास कमी होईल. त्या म्हणजे - आदल्या दिवशीच नेत्याने सर्व सहभागींना योग्य जागा दाखवून ठेवावी. मुली/ महिलांना वेगळी जागा ठरवून ठेवावी. महत्त्वाची सूचना म्हणजे दगडाने छोटा खड्डा करावा आणि विधी आटोपल्यावर वर माती टाकावी याचे कारण एखादा कँप असेल आणि प्रातर्विधीची जागा जरी लांब असली तरी कँपवर माशांचा त्रास होतो तो होत नाही, हा अनुभव आहे! किमान एवढया सूचना अवलंबल्या तरी आपले व इतरांचे गडदर्शन सुखकर होईल.
खरं तर हा खरडायचा विषय नव्हे पण भोग भोगल्यावर तितकाच महत्त्वाचा वाटला म्हणून खरडलं.

Thursday, January 6, 2011

सुवर्णदुर्गाच्या मुलुखांत...भाग २

आपटेकाकांनी रात्रीच एक मोठं आमिष दाखवून ठेवलं होतं '..सकाळी या मंडळींचं आवरून व्हायच्या आत आपण मुरुडचं दुर्गादेवी मंदिर बघून येऊया'.. आदल्या दिवशीच्या धावपळीचा शीण अंगात असूनही सकाळी लवकर जाग आली. आणखी काही जण तयार झाले. सेनापती विनयच्या कानांत कुजबुजून आम्ही मुरुडकडे पायीच निघालो.

मुरुड गांवात शिरल्याबरोबर समोरच दुर्गादेवीचं भव्य मंदिर दिसतं. पेशवेकालीन भव्य असलेल्या या मंदिरासमोर दगडी दिपमाळ आहे.

आत शिरल्यावर डावीकडे एक मोठी पितळी घंटा दिसते तिच्यावर पोर्तुगिज शब्द कोरलेले आहेत. आतमधील लाकडी खांब व वाशांवरील कोरीव काम खूप देखणं आहे. सध्या ऑइलपेंटने रंगवलेलं असलं तरी त्याचं सौंदर्य अजिबात कमी झालेलं नाहीये. पैकी हत्तींची झुंज, भल्या थोरल्या नागाचं शिल्प बघणेबल आहे.

गाभार्‍‍यातील श्रीदुर्गादेवीची मूर्ती खूप सुंदर आहे.

मंदिरासमोर एक झिजलेला गधेगाळाचा दगड आहे. मंदिराच्या आवारातही आणखी छोटी मंदिरे आहेत. या दुर्गादेवी मंदिराच्या चौकातच महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा अर्धपुतळा बसवलेला आहे.
मुरुडच्या शाळेनं तीन भारतरत्ने निर्माण केली आहेत. पां. वा. काणे, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाबासाहेब आंबेडकर हे तिघेही या मुरुडच्या शाळेचे विद्यार्थी. मुरुड हे कर्वेंचं गांव. चौकाजवळच महर्षी धोंडो केशव कर्वेंच्या वस्तू जतन करुन ठेवलेलं संग्रहालय आहे. महर्षी कर्वेंच्या पुनर्विवाहाचा योग ज्या वझे कुटुंबियांनी जुळवून आणला, त्या वझेंच्या आजच्या पिढीने स्व्तःच्या खाजगी जागेत हे स्मारक उभं केलेलं आहे. महर्षी कर्वेंच्या दैनंदिन वापरातल्या वस्तू, जगातील नामवंत मंडळींसोबत असलेली त्यांचे दुर्मिळ फोटो, त्यांच्या हस्ताक्षरातील कविता, त्यांच्या कार्याची ओळख व चरित्रपर माहिती येथे बघायला मिळते. येथे प्रवेश विनामुल्य आहे. या संग्रहालयाच्या मागील बाजूस वझेंचं सागरीका रिसॉर्ट आहे. (फोन नं. ०२३५८-२३४७३७) अगदी समुद्रकिनारी, नारळ-पोफळीच्या बागेत त्यांनी निवास व भोजनाची सोय केलेली आहे. आमच्यातील दोन आरंभशूर सदस्य मंदिर बघत असतांनाच आलेली बस बघून पळाली होती. आम्ही हे सगळं बघून सरळ रीक्षा करून पुन्हा जोशांच्या हॉटेलपाशी येऊन कळपांत सामिल झालो आणि सकाळची पोटपूजा करून घेतली.
आता टार्गेट मंडणगड. ..पण विनयच्या डोक्यात वाटेत लागणार्‍या पालगडाचा किडा (..की पालीची शेपूट!) वळवळत होता. पालगड गांवात गाडी घातली. स्थानिकांकडून गडाच्या वाटेबद्दल सामान्य ज्ञानाचा तास झाल्यावर लक्षात आलं की आत्त्ता हे होणे नाही. पालगड हे साने गुरुजींचं जन्मगांव. गांवात त्यांचं स्मारकही आहे. हम्म्म्म! पुन्हा कधीतरी!! आता मंडणगड... मंडणगड गावांत शिरतांना ड्रायव्हर केबिनमध्ये बसलेला मी, आपटेकाका आणि ड्रायव्हरने एक धमाल गोष्ट बघितली... एक बैल पुढचे दोन पाय वर करुन कशावर तरी चढला होता. लांबून काही अंदाज येईना की ह्याचं नेमकं कांय चाललंय! गाडी थोडी जवळ आल्यावर ड्रायव्हरने हॉर्न दिला...आणि पॅशन प्लस बाइकवर चढलेला बैल तिच्यासकट रस्त्यालगतच्या उतारावर धडपडला. कोण कशाने पॅशनेट होईल काssss ही सांगता यायचं नाही ..असो. आता जेवणाची काहीतरी व्यवस्था सांगूनच किल्ला बघायला जायचं असा बेत ठरला होता. एकाने गांवाच्या अलिकडे एक घैसास म्हणून खानावळ आहे म्हणून सांगितले होते, तिथे गेलो तर आम्ही त्यांची वडीलोपार्जित जमिन मागत असल्याप्रमाणे अटी घालायला सुरुवात केली. शेवटी वैतागून निघालो आणि मुख्य चौकाच्या थोडं अलिकडे उजव्या हाताला बेसमेंटला एक छान हॉटेल गावलं..तो पहिल्याच्या बरोबर उलट! सगळ्या गोष्टींना 'हो' देत आमच्या सॅक्स ठेवायला वेगळी जागाही दिली. त्याला ऑर्डर दिली आणि आम्ही मंडणचढाईकरीता कूच केले. मंडणगडावर जायला वरपर्यंत कच्चा गाडीरस्ता झालेला आहे. त्याच रस्त्याने पाउण ते एक तासात वर पोहोचायला होतं. शेवटच्या टप्प्यांत थोडया पायर्‍या आहेत. वर आल्यावर उजव्या बाजूला काही जोती, थडगी सोडली तर फारसे अवशेष नाहीत. मागे फिरून डावीकडच्या बाजुला निघालं की बांधकामाचे अवशेष, तटबंदीचे अवशेष दिसतात. एक मोठा तलाव व त्याच्या वरच्या बाजूला गणेशमंदिर आहे.

तलावाकडून दक्षिण टोकाकडे जातांना उजवीकडे एक देवकोष्ठासारखी कमान दिसते, ती कसली याचा मात्र उलगडा झाला नाही.

पुढे गेल्यावर एक टाकं आहे, तोफा आहेत. शिलाहार राजा भोजाने १२व्या शतकांत या किल्ल्याची उभारणी केली. १६व्या शतकांत अदिलशाहीकडे हा किल्ला होता. खोगिरासारख्या आकाराच्या गडफेरीला दिडेक तास पुरतो. उतरतांना पोटांत कावळ्यांचा डीजे चालू झाला होता, त्यांत त्रास म्हणजे त्या उन्हांत उतरतांना जेवणाचा माहित असलेला फर्मास मेन्यू डोळ्यासमोर नाचत होता. एकदाचे त्या हॉटेलात जाउन कोसळलो. तृप्त होऊन परतीच्या प्रवासात बसल्याबरोबर पुर्णब्रह्म अन्न डोळ्यांत उतरले. सुवर्णदुर्गाच्या सुवर्णमुलुखाची आलेली सुवर्णनशा घरी आल्यावरही तशीच होती... ! अजूनही अधूनमधून तरंगवतेय!!