Thursday, May 27, 2010

मिसळ

कुणीतरी आयत्या वेळी आल्यावर कांय करायचं या गरजेतून जसा भडंग चा जन्म झाला, त्याप्रमाणे उरलेल्या चार-दोन जिन्नसांचं नाष्ट्यासम काहितरी करण्याच्या प्रयोगातून मिसळीचा जन्म झाला असावा, मिसळीच्या जन्मठिकाणावरून मतभेद होऊ शकले तरी मिसळीच्या लोकप्रियतेबाबत मात्र सर्वदूर एकमत असेल यांत शंका नाही.

स्वतःला मिसळभोक्ते म्हणवत असाल तर तुम्ही सकाळी मिसळवाला फोडणी देत असलेल्या वेळीच तिथे हजर असायलाच हवं. सूर्य वर चढत जातांना ज्याप्रमाणे नीरेची ताडी होते त्याप्रमाणे मिसळीची उसळ होत जाते. नाक झणझणावून टाकणार्‍या फोडणीच्या वासासारखा ब्रह्मानंद नाही. 'पंगतीत बसल्यावर वाढपी ओळखीचा हवा.कारण तुम्ही कुठेही कोपर्‍यांत बसला असाल तरी तुम्हांला हवे ते व्यवस्थित मिळते' असे पूर्वीचे लोक म्हणत, त्यांवरून जर मिसळवाला तुमच्या ओळखीचा असला तर तुमच्या मिसळीला बाकीच्यांपेक्षा चव आलेली असते.

मिसळस्थानांचे प्रकार दोन. पहिला प्रकार म्हणजे ज्या ठिकाणी आपण कुटुंबासहित बसून सुटसुटीतपणे मिसळ खाऊ शकतो, अशी hotel किंवा तत्सम जागा. दुसरा प्रकार म्हणजे रीक्षावाले वा तत्सम मंडळींबरोबर पंगतीला उभे राहून गाडयाच्या तिन बाजूंस असलेल्या लाकडी तटबंदीवर ठेवलेल्या पलेटमधला पाव हातांत धरुन दुसर्‍या हाताने तुकडे मिसळीच्या रश्श्यांत भिजवत मिसळ हाणणे.

मिसळीला फाकडू बनवण्यांत तिच्यात असलेल्या घटकांचा 'वाटा' फार महत्त्वाचा ठरतो. पहिला म्हणजे मिसळीचा बेस असलेली उसळ. ही जर व्यवस्थित मोड आलेली असली तर मजा आणते. त्याच्यावरचा थर हा प्रत्येक मिसळवाल्यासाठी optional असतो. यांत पोहे, भावनगरी, शेव, साबुदाणा खिचडी, चिवडा इ. पदार्थांपैकी काहिही असू शकते. या सर्वांवर कडी करणारा तिसरा थर आणि प्रत्येक मिसळीचा अतीमहत्त्वाचा घटक म्हणजे मिसळीचा रस्सा आणि त्यांवर तरंगणारी तर्री! 'मिसळीची तर्री' हा शब्द जरी उच्चारला तरी भल्याभल्यांच्या (आता हे वाचणार्‍यांच्यासुद्धां!) लाळग्रंथींचे नळ धो धो वहायला सुरुवात होते, आणि शेवटी कांदा, कोथिंबीर, लिंबू वगैरे मंडळी लज्जत वाढवण्यास मदतीला असतातच. काही ठिकाणी हंगामात कैरीच्या बारीक फोडीही वरुन घालतात. मिसळ ही मूळ चवीप्रमाणे तिखटच खायला हवी. तिखटपणा झेपत नाही म्हणून मग दही, पापड इत्यादींशी सलगी करून मिसळ खाणार्‍यांना काटकोनाच्याच पंगतीत बसवायला हवं! हे म्हणजे मूळच्या गोडसर असलेल्या भोपळयावर फोडणी व तिखटमिठाचे संस्कार करून तथाकथित भाजी करण्यासारखं झालं! त्यापेक्षा भोपळयाचे घारगे केले तर किती दणादण संपतात!
मिसळीबरोबर घट्ट नातं आहे ते पावाचं.. अमुक एका ठिकाणी तर स्लाईस ब्रेड मिळतो म्हणून तिथल्या मिसळीकडे पाठ फिरवणारी मंडळी आहेत इतकं पावाचं महत्त्व मिसळीसोबत आहे. पण हे काहीही असलं तरी पहिला मान मिसळीचाच.. मिसळ समोर आली की थेट पाव मोडून रश्शात बुडवण्याआधी नुसत्या मिसळीचे दोन चमचे चाखून बघा. त्याचे कारण म्हणजे पावामुळे मिसळीची मूळ चव बरेचदा लक्षात येत नाही. नुसतंच उदरभरण होतं. आम्हांला काही ठिकाणी तर उसळीला आंबूस वास यायला लागलाय हे केवळ या सवयीमुळे लक्षात आलेलं आहे. बाकीचं पब्लिक मात्र मजेत खात होतं, कारण फुल्ल तर्री-रस्सा-पाव आणि गप्पा यामुळे तो किंचित आंबूसपणा लक्षात येत नव्हता. म्हणून पहिले दोन चमचे नुसत्या मिसळीचे खा, मग समजेल मामलेदार कचेरीच्या मिसळीतली उसळ किती चवदार असते आणि दिवसभर तिथला घाणा कां सुरु असतो ते..!
ट्रेकर्स मंडळींचे नि मिसळीचे एक वेगळे भावानुबंध आहेत. सह्याद्रीत सक्काळी कुठल्याही दुर्गपायथ्याच्या मोठ्या गांवात जाऊन पडलात तरी मिसळ ही मिळणारच आणि ती एकदा चापली की दुपारच्या जेवणापर्यंत निश्चिंती असते. कैकदा तर आख्खा ट्रेकही मिसळ तारुन नेते. ट्रेकच्या फोटोंमध्येदेखील आधी मिसळीचा फोटो आणि मग किल्ल्याचा पायथ्याकडून घेतलेला फोटो असतो इतका मान मिसळीचा आहे. या मंडळींची कुठल्या गांवात कुठल्या हाटीलात किंवा गाडीवर मिसळ चांगली मिळते या विषयावर पीएचडी असते आणि चांगल्या ठिकाणांची प्रसिध्दीही हेच लोक जास्त करत असतात.
'येथे ट्रेकर्सना सवलतीच्या दरात मिसळ मिळेल' अशा पाटीच्या आम्ही शोधात आहोत... :)

(हा लेख लोकप्रभा ऑक्टो. २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे)

3 comments:

  1. मला शामसुंदर, विहार आणि तुषारची मिसळ आवडते. प्रत्येक ठिकाणची चव वेगवेगळी आहे.

    ReplyDelete
  2. सुंदर लेखन! लेखातील मिसळीच्या विविध गुणधर्मांचा विस्तृत खुलासा वाचून मजा आली.

    ReplyDelete