Friday, July 16, 2010

खंडोबाची टेकडी

खंडोबाची टेकडी हे ठिकाण माहित नाही असा माणूस नासिकमध्ये विरळाच! नासिकपासून १५ किमी. वरील देवळाली कॅंप भागात असलेली ही टेकडी स्वच्छ, मोकळ्या हवेमुळे व निरव शांततेमुळे प्रसिद्ध आहे. देवळालीतून निघाल्यावर काही मिनिटांतच टेकडीजवळ पोहोचायला होतं.हा संपूर्ण भाग सैन्याच्या ताब्यात असल्याने पायथ्यापाशी जवान उभे असतात. पायथ्यापाशीच डावीकडे एक तोफ दिसते. चढाईच्या सुरूवातीलाच या ठिकाणाबद्दलची माहिती लिहिलेली आहे. त्यांत या टेकडीचा विश्रामगड आणि शिवाजीमहाराजांच्या या टेकडीवरील वास्तव्याचा चुकीचा उल्लेख आहे. खरं तर विश्रामगड म्हणजे इथून जवळच असलेला पट्टा किल्ला व महाराजांचं वास्तव्य पट्टा किल्ल्यावर होतं. असो. टेकडी चढतांना रूंद व कमी उंचीच्या पायर्‍या असल्याने दमछाकही फारशी होत नाही. टेकडीचं सुंदर सुशोभीकरण केलं आहे. माथ्यावरील घुमटाकृती खंडोबाच्या मंदिराला आटोपशीर तट आहे.




मंदिराच्या आवारामध्ये बघण्यासारखे म्हणजे एक मोठी घंटा ...



..आणि बसलेल्या शंकराच्या डोक्यावर तोंड रेलवून मागे उभ्या असलेल्या नंदीची मूर्ती आणि द्वारावर उभे असलेले २ राक्षस-- मणि आणि मल्ल. या मणी आणि मल्ल या राक्षसांपासून भक्तांचे संरक्षण करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्यांचा विनाश केला. ते दोघेही शिवभक्त होते. परंतु त्यांना शंकराचाच विसर पडला होता. त्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी शंकराला मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला होता, अशी आख्यायिका.



गाभार्‍यात ८ फुटी मुर्ती असलेल्या खांडधारी खंडोबाच्या दोन्ही बाजूंस बाणाई व म्हाळसाई यांच्याही मुर्त्या आहेत.राक्षसांशी झालेल्या युध्दात 'खांड' नामक तलवारीचा वापर कण्यात आल्याने खांडधारी 'खंडोबा'च्या नावाने मार्तंड मल्हारी ओळखले जाऊ लागले. खंडोबा मुळात कर्नाटकमधील देव आहे. कानडी भाषेत येळू म्हणजे सात व कोट म्हणजे कोटी म्हटले जाते. खंडोबाचे सात कोटी सैन्य होते.सात कोटींच्या संख्येत आपल्या घरात धनधान्य संपत्ती नांदावी,असा हेतु त्यांत आहे. त्यामुळे 'तळी आरती'च्या वेळी 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष केला जातो.
खंडोबाच्या पत्नीचे नाव म्हाळसा होते म्हणून खंडोबांला म्हाळसाकांत म्हटले जाते. खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई धनगर होती. धनगर समाजाची ती कुलदेवता आहे. खंडोबाची पूजा करताना तळी भंडार्‍याला खूप महत्व आहे. नवीन येणारी बाजरी, वांगी, गुळ, लसुण, कांदे यांचा नैवेद्य यावेळी दाखविला जातो. खोबर्‍याचा प्रसाद देऊन कपाळावर हळदीचा भंडारा लावला जातो. त्यासोबत 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषात 'तळी' उचलून खंडोबाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.खंडोबाचा उत्सव चंपाषष्ठीला असतो.

अशी ही अर्ध्या दिवसाची खंडोबाची टेकडीची वारी सुफळ संपुर्ण...

1 comment: